बुधवार, २१ मे, २०२५

सारजामाय




सारजामायला शेताकून यायला उशीर झालता. शेताकून आईसंगं ती घरी आली. च्यापानी झालं. आईनं कायतर बांधून दिली. अंधार पडलता. सारजामाय निघाली तिच्या घरला. बौद्धवाडा हायवेच्या पलीकडं. मी म्हनलो, "जातो. सोडून येतो तिला पलीकड."

आई म्हनली, "जा बाबा! आधीच एक्या कानाला ऐकू येतनी तिला." सारजामायसंग निघालो. सडक आल्यावर तिच्या काटकुळ्या वाळलेल्या बाभळीच्या लाकडासारख्या हाताला धरलो. दोन्हीकडं बघत गाड्या जाऊ दिलो. पलीकडं सोडलो. मान हलवून इशाऱ्यानंच ‘जातो आता’ म्हनलो. सारजा मायनं हसतमुख चेहऱ्यानं परवानगी दिली. मी घरी आलो. आल्यावर भाऊ म्हनले, "आसंच काळजी घेवं गा!"

मी म्हनलो, "माणुसकीनं तर वागावंच पण आपण जपून राहिलेलंच बरं! आपल्यावर बला नको."

      आधी सारजामाय शेतातल्या कामाला यायची. तिचा एक ल्योक देशावर करून खायला गेलेला. एक ल्योक-सून तिच्याजवळ. नवराबी बसून पडलेला. सारजामाय साठी पार झालेली आज्जीबाई. काळी-सावळी नीट नाकाची, काळी, काटकुळी, सदा हसतमुख. तिचा एक भाऊ चांगला नोकरदार आहे. तो तिला दर महिन्याला हजार रुपये मनिऑर्डर पाठवायचा. सारजामाय आईला कौतुकानं सांगायची. ल्योक कधी तर ट्रकवर जायचा. घर भागवायची खरी जिम्मेदारी सरजामायवरच. बहुदा कारभाऱ्याच्या शेतातच ती मजुरी करायची. कारभाऱ्याचं शेतही बक्कळ आहे. सालभर काय ना काय कामं राहतातच. आम्ही सांगितल्यावर कधी सवड बघून आमच्याही शेतात यायची. आईला सारजामायचं काम लई पटायचं. आईसारखंच तीही काम चांगलं करायची. इतर रोजगारी करतात तसं, वरवरचं आणि वेळकाढू काम ती करायची नाही. स्वतःचं शेत समजून शेतमालकीनीसारखं काळजीनं करायची. कधीकधी  आईला सल्लाही द्यायची. बांधाच्या कडंचा हराळीचा दाढवा कापून बांध स्वच्छ करायची. 

         माझं लग्न जमल्यावर बांधकामाच्या, शेतातल्या आणि घरच्या कामानं आईची पाठ दुखायला लागली. डॉक्टरनं विश्रांतीचा सल्ला दिला. पण दिवस कामाचे. आईनं सारजामायला 'लग्नाचं काम करशील का?' असं विचारलं. तिनं होकार दिला. काही हजार रुपये आणि इरकल लुगडं-चोळी असं ठरलं. सारजामायनं आधार दिला आणि लग्न पार पडलं. तिनं लुगडं-चोळीऐवजी पैसे द्या म्हटल्यामुळे तिला पैसे दिले. आहेर राहिला तो राहिला. पुन्हा कधीतरी सारजामायच्या घरी कार्यक्रम होता; तेव्हा मात्र इरकल लुगडं, चोळीचा खण असा आहेर घेऊन आई तिच्या घरी गेली होती. माझी बायकोही शिक्षिका. तिला दररोज पस्तीस किलोमीटर अंतरावर नोकरीच्या गावी बसने प्रवास करावा लागे. ती सकाळी साडेसातच्या बसने जायची आणि रात्री सातला घरी परतायची.  लग्नानंतर खरी तारांबळ सुरू झाली. आम्ही दोघं आणि भाऊ असे तिघांचे डबे सकाळी करावे लागायचे. आईचे हाल बघून बहिणीने एकदा सारजामायला 'धुणीभांडी करशील का?' म्हणून विचारलं. सारजामायला कामाची गरज होती म्हणून तिनं 'व्हय' म्हटलं. 'किती पैसे देऊ?' असं विचारल्यावर तिनं दोन बोटं करून 'दोनशे द्या. आणि 'हिकडूनच कामाला जाईन. सकाळची भाकर तेवढी द्या.' असं ती म्हणाली. तरी आम्हाला तिनं कमीच मागणी केली असं वाटलं; म्हणून पुढे दोन-तीन महिन्यांनी मीच तिला महिन्याला पाचशे रुपये देऊ लागलो. सारजामाय सकाळी आली की, आई तिला स्वयंपाक घरात बोलावून घट्ट दुधाचा चहा द्यायची. आधी सारजामाय संकोचायची; पण तिला आम्ही हट्टाने स्वयंपाक घरात बसवायचो. हळूहळू ती सरावली. मी जेवताना चहा प्यायला आलेली सारजामाय आड व्हायची. मी इशाऱ्याने तिला बोलावून घ्यायचो. 'कायबी होतनी. तू घरातलीच हाय्स. यी!' मनलो की हासायची. सदा हसतमुख आणि प्रसन्न. 

       पाठदुखीमुळे मी आईला शेतातल्या कामाला जाऊ देत नव्हतो. सारजामाय एकटी जाऊन शेतातली कामं करायची. भाऊ म्हणायचे, "बायला! म्हातारी लई इमानदार हाय. बस कर आता म्हनलं तरबी दिवस मावळजोपाना उटतच नाही. आनी येताना जळनाचं वज्जं आनत्याय डोस्क्यावर."

      मध्यंतरी बहिण आजारी पडली म्हणून आईला पुण्याला जावं लागलं. माझी पत्नी पहाटे चारला उठून स्वयंपाक करायची. भावाचा डबा द्यायची. आमचे दोघांचे डब्बे तयार करून, सात वाजता सारजामाय आल्यावर तिला चहा करून द्यायची. तिची भाकर बांधून ठेवायची. सारजामाय 'राहू द्या. राहू द्या...' म्हणायची. बायको इशाऱ्यानं समजवायची. आई दहा-बारा दिवसांनी परत आली. येताना आईला कारभाऱ्याच्या घरातील बायकांनी थांबवून घेऊन सांगितलं, "सारजामाय तुमच्या सुनंचं लई कौतुक करलालती. बिचारीला डिवटी असूनबी सासूचा नेम चुकू दिलनी. मला कवा बिनच्याचं, बिन भाकरीचं यिऊ दिलनी, असं सांगत्याय. चमाला लई चांगली सून मिळाली, आसं म्हनत्याय."

          शेतातल्या कामावरून सारजामाय घरी आल्यावर तिनं आणि आई बोलत बसल्या की, मी रागवायचो. तिला अंधार पडतोय. घरी सोडून यावं लागेल म्हणायचो. म्हातारी रविवारचा बाजार उमरग्याला जाऊन स्वतः आणायची. कधी पैसे साठवून नातीला नथनी कर. कधी लेकीला आहेर कर. अशा काहीबाही उठाठेवी करायची.

        सांच्यापारी शेतातल्या कामावरून आल्यावर चहा पेलेला कप तिनं धुवायला नेताना, आई तो हिसकावून घ्यायची. तिला कप धुवू द्यायची नाही. स्वतः धुवायची. रास झाल्यावर गहू, ज्वारी, हरभऱ्याचे चुंगडे बांधून द्यायची. मला गाडीवर तिच्या घरी टाकायला सांगायची. तिचं घर साधंच होतं; पण स्वच्छ आणि टापटीप. मध्यंतरी सारजामायनं घरचं काम सोडलं. "पुण्यातला ल्योक नको म्हनतोय. लोकं लावतीते त्येला." म्हनली. आईनं हसतमुखानं होकार दिला. तरी अधूनमधून शेताच्या कामाला ती यायची. एके दिवशी आई नळाचं पाणी भरताना पडली. हात फ्रॅक्चर झाला. घरात काम करायचं अवघड झालं. माझी बायको होईल तेवढं करून शाळेला जायची. पण बाकीची कामं आईला एका हातानं करावी लागत. एके दिवशी सकाळी उठल्यावर आई बाहेर येऊन बघते तर काय! सारजामाय दारात भांडी घासत बसलेली. आई म्हनली, "सारजामाय! कसं काय आलीस? 

"तुमचा हात मोडल्यालं कळालं कारभाऱ्याच्या घरातून. कसं करताव आता? मनून आले."

म्हातारी पुन्हा धुणीभांडी स्वेच्छेनं करू लागली. दोघी पुन्हा सुख-दुख उकलू लागल्या. आई तिची मैत्रीण झाली होती. म्हातारी खाल्ल्या मिठाला जागली. आताच्या काळात अशी माणसं भेटतील का? आईनं तिला कधीच शिळंपाकं दिलं नाही. तिचं पोट सांभाळलं. तिच्या गरजा भागवल्या. तिचं सुख-दुख आत्मीयतेनं ऐकून घेतलं. म्हातारीनंही कधीच उपकार राहू दिला नाही. रक्त-घाम आटवून उतराई केली. खरंतर तिनंच आमच्यावर उपकार केले. दरम्यान भावाचं लग्न झालं. म्हातारीनं तेही लग्न पार पाडलं. धुणीभांडी केली. भाकर तुकडा खाऊन रानात कामं केली. शेजारी-पाजारी जळायचे. म्हातारीला 'त्यांचं काम सोड. आमचं कर. शंभर-दोनशे जास्त देतो.' म्हणायचे. पण म्हातारी माणसं ओळखायची. तिच्या शेतातल्या कामावरही शेजारचे शेतकरी जळायचे. मालकीन नसतानाही ही म्हातारी काम करते. बाकीच्या रोजगारी बायांच्या दुप्पट काम करते, हे त्यांनाही कळायचं. कुणी तिला बळंबळं हातात हजार रुपये टेकवून आमच्या कामावरून पळवायला बघायचे. म्हातारी हतबल होऊन आईला सांगायची, 'आसं केले ओ! का करू सांगा!' तरी म्हातारी भिडंखातर ते काम करत-करत आमचंही काम करायचीच. 

         याच दरम्यान तिच्या मुलाचा अपघात झाला. थोडक्यात बचावला. पुण्याला राहणाऱ्या ल्योकांनं ऐपत नसूनही भावाचा दवाखाना केला. ल्योकाला सारजामायनं आता घरी आणलं होतं. आता ल्योक कायमचा अधू झाला होता. औषध-गोळ्यांचा खर्च वाढला होता. सुनंचं आणि ल्योकांचं आधीच पटत नव्हतं. भांडणं व्हायची. तरी सारजामाय घरातलं समदं काम, सैपाकपानी, ल्योकांचं, नवऱ्याचं जेवणखानं करून कामाला यायची. दरम्यान हिचं अबोर्शन झाल्यामुळे मी तिच्या नोकरीच्या गावी घर केलं. तिच्याऐवजी मीच प्रवास करू लागलो. कधी सणावाराला आम्ही आलो की, म्हातारी आस्थेनं विचारपूस करायची. 'बरे हाव का?' म्हणून विचारायची. वर्षभर तिनं आमच्या घरचं काम केलं. नंतर तिनं घरची काम बंद केली; तरी रानात राबत होती. एकदा गावाकड आल्यावर मी आईला विचारलं, "सारजामाय कशी हाय?"

आई म्हनली, "लई खचल्याय की रे म्हातारी!" 

"का बरं? चांगली होती की परवापर्यंत तर."

"तुला माहीत झालनी? तिच्या ल्योकानं फाशी घेतला की रे"

"कोणत्या ल्योकानं?"

"अक्सिजेंटनं आधू झालेल्या. त्येचं बायकूसंगंबी भांडन झालतं. तिनं माहेरला निघून गेलती. त्येला तरासबी व्हायचा मन." मी विचारलं, "कधी झालं ह्ये?" आई म्हनली, "आजून आपलं काम करत हुती बाबा. तवाच झालं." मी हळहळलो.

        एकदा सारजामाय शेतात कामाला आली होती. रानातून आईसंगं घरी आल्यावर मला काय बोलावं तेच सुचेना. तिच्या चेहऱ्यावरचं भाबडं हसू गेलं होतं. तिच्या भाबड्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. मी म्हणालो, "मला आत्ता कळालं ये" 

ती मला म्हनली, "म्या जित्ती आसजोपाना त्येला संबाळले आसते. पर आसं करायचा नव्हता." ती रडू लागली. माझ्या पोटात कालवलं.

       पुन्हा आम्ही आमच्या व्यापात अडकून गेलो. दिवाळीच्या सुट्टीला घरी आलो. पडवीत गरम होत होतं. आईला विचारलं, "खालचा फॅन कुठं हाय?" आईनं सांगितलं, "सारजामायला दिले मी."

'कसं काय?' असं विचारल्यावर तिनं सांगितलं, "सारजामाय पडून हाय की रे. अरे, लई दिवस झाले. ल्योक गेल्यापसून लई खचली बघ म्हातारी. मी बघायला गेलते एक्या दिवशी शिरा घिऊन तर मला म्हनली, 'लई उकडलालंय. आंगात धग हाय निसती.' म्हनून मी भाऊला फॅन न्हिऊन द्याला सांगितले."

"मग दवाखाना ते केलनी कोन?"

"पुण्यातल्या ल्योकानं दाखिवला चांगल्या दवाखान्यात. थोडे दिवस ठिवूनबी घेतला. म्हातारी ऱ्हावं का? आता गावाकडच सोड मला म्हनली मन. आनून सोडला घरी."

"भाकर कोण घालतंय मग आता तिला?"

"गावातली लेक बघत्याय. म्हातारीला तर कायबी जाईना. ऱ्हायला म्हातारा. त्येला तर आन कुटं गोड लागतंय?"

        पुढच्या एका खेपंला आल्यावर आईनं सारजामाय गेल्याचं सांगितलं. अरेरे! मन भरून आलं. डोळे ओले झाले. सारजामाय आमच्या आयुष्यातून कधीच जाणार नव्हती. 

      परवा एकदा मी लग्नाचा अल्‍बम बघत बसलो होतो. दोन-तीनदा निरखून अल्बम बघितला. तो काळ. ते लोकं. दहा वर्षांनी पुन्हा बघत होतो. अचानक एका फोटोत सारजामाय दिसली. गुडघे वर घेऊन, दोन्ही हाताचा गुडघ्याला वेढा घालून, चष्म्यातून समोरचा सोहळा पाहत बसलेली. मी तटकन उठून बसलो आणि आईला जोरात हाका मारू लागलो. 'काय?' म्हणत आई आली. मी म्हनलो, "हे बघ." आईला दिसलं नाही. तिनं चष्मा आणला. चष्मा लावून आईनं फोटो बघितला. मी फोटोतल्या बायांच्या गर्दीतल्या तिच्या चेहऱ्यावर बोट ठेवलं. आईचा चेहरा उजळून निघाला. आई म्हनली, "सारजामाय हाय की रे. कसं बसल्याय बघ. लग्नाला आलती. मला याद हाय."

अन् आईच्या डोळ्यात डबडब पाणी.


          - प्रमोद कमलाकर माने

पूर्वप्रकाशित: अक्षरदान दिवाळी २०२०

आभार: मोतीराम पौळ

रेखाटने साभार: दिलीप दारव्हेकर

बुधवार, १४ मे, २०२५

दौरा


 सोयाबीनचं पीक पाण्यावाचून सुकत चाललं होतं. बांधा-धुर्‍यावरचं गवत वाळून कोळ झालतं. उडीद-मूग तर वाळूनच गेलते. अनेकांनी कुळव फिरवून मोडून टाकले होते. अशातही एखादी झड पडून गेली, तर सोयाबीन थोडंफार हाताला लागेल; अशी सगळ्यांनाच आशा होती. सोयाबीन पेरल्यावर चार-पाच पानांवर असताना एक मामुली झड पडून गेली होती. लोकांनी आशेनं खुरपणी-फवारणीचा खर्च केला होता. पण अख्खा ऑगस्ट कोरडा गेला. सोयाबीनचा फुलोरा गळून पडत होता. 

        आंब्याच्या झाडाखाली बसून माऊली काडीनं मातीत उगाचच रेघोट्या ओढत होता. माऊलीनं खुरपणासाठी लग्नातली अंगठी उमरग्याच्या सोनाराकडे गहाण ठेवून महिना तीन टक्क्यानं पाच हजार आणले होते. अंगठी नसलेल्या बोटावर अंगठीचा पांढरा वण दिसत होता. माऊलीच लक्ष त्या पांढऱ्या वणाकडे गेलं. फवारणीचं औषध उधारीवर आणलं होतं. फवारणीचा पंप भाड्यानं आणून दोघा बापल्योकानंच दोनदा फवारणी केली. रघुतात्या पाणी आणायला आणि मावल्या फवारायला. पलीकडं भावकीच्या सोयाबीनमध्ये स्प्रिंकलर चालू होतं. माऊली उदास डोळ्यांनी ते दृश्य पाहत होता. शेतात पाणी व्हावं यासाठी रघुतात्यानं खाल्लेल्या खस्तांचा इतिहास त्याच्या डोळ्यांपुढून सरकू लागला. पाण्याच्या नादानं घर कर्जबाजारी झालं. कडूसं पडल्यावर माऊली उठला. तोंडातली तंबाखू थुंकून गाडीवाटेला आला. मागून नबी येत होता. त्यांनं हाक मारली. माऊली थांबला. दोघं बोलत गावाकडं आले. घरी आल्यावर वसरीवर रांजणातल्या पाण्यानं पाय धुतले. बाहेर पत्र्याच्या शेडमध्ये त्याची बायको भाकरी थापत होती. चुलीच्या उजेडात ती देखणी दिसत होती. घरात आला. मायबाप टीव्हीवर देवाची मालिका बघत बसले होते. माऊली पलंगावर आडवा झाला. बायकोनं लग्नातल्या फुलांच्या कुंड्या, तोरणं यांनी खोली सजवली होती. वर लक्ष गेलं. मोजून साडेचार पत्रे. तेही जागोजागी एमसील लावून अंगावर गाठी झाल्यासारखे. माऊली चौकात आला. गणूच्या टपरीवर एक सुपारी सांगितली. गणू म्हणाला, 

 “उधारी लई झाल्याय. कवा देतूस गा?”

 “देतो, जरा दम धर.” -माऊली.

 “नाही गा, माल भरायचाय. बग काय तर हाय का? उदार दिऊन पार कड लागली.”

 “हंऽ पर माजं तसं नाही. देतो म्हंजी देतो.” – माऊली. गणू सुपारी घासू लागला. सुगंधी छिटा सुपारी तोंडात टाकून माऊली सटकला. डोकं फ्रेश झाल्यासारखं वाटलं. कट्ट्यावर बसून एक पिचकारी मारली. पुन्हा डोळ्यापुढं सुकलेलं सोयाबीन दिसू लागलं.

 माऊली शेतात. शेतातून घरात. चौकात. शेतात...

 पाऊस कुठं बेपत्ता झालता कुणाला ठावं? रात्री पलंगावर डोळे उघडे ठेवून नुसतं पडून राहू लागला. आधीच्यासारखं हा तिची वाट न पाहता आपल्याच तंद्रीत पडलेला. ती बिचारी शेजारी गुपचूप झोपायची. कामानं थकल्यामुळे लगेच झोपी जायची. हा दीड-दोन वाजेपर्यंत जागायचा. सकाळी आठला उठायचा. सोयाबीन चक्क गेलं होतं. लोकांनी सोयाबीनमध्ये कुळव घातले होते. जनावरं सोडली होती. पण माऊलीला तसं करू वाटत नव्हतं. लागलेल्या चार-चार शेंगा एखादा झडगा आला तर फुगतील, पदरात पडतील- असं वाटायचं.

 माऊलीची माय शारदा कामाला जात होती, म्हणून घर भागत होतं. रघुतात्याही भाड्यानं कुळवपाळ्या करत होता. पण काम कवातरच मिळायचं. भावकीतला नारायण आबा एके दिवशी माऊलीकडं आला. त्याचं सोयाबीन स्प्रिंकलरच्या पाण्यावर छान आलं होतं. फवारणीसाठी त्याला माणूस मिळत नव्हता. माऊली मोबाईलवर गेम खेळत बसला होता. त्याचं लक्ष वर गेलं. दारात आबा. 

 “या आबा.”

 “तुला फोनच करनार होतो, पन समक्ष बोलावं मनून आलो.”

 “बोला.”

 “सोयाबीनवर लई आळी झाल्याय गा. आवशीद आनून ठिवलाव. यितूस का उद्या फवारायला?”

 “पानी कोन देतंय?” -माऊली

 “तात्याला घि मग संगं. आर्दा रोजगार देतो तात्याचा. बारा-तेरा घागरीच पानी पडतंय की. तुजा डब्बा पार होजूकना बसायचंच हाय.” -आबा.

 “तात्यालाच इचारा. माजं काय नाही, म्या येतो.”

 “कुटं गेलते तात्या?" 

 “भजनाला गेल्यासतील."

 “मग गाठतो त्येला देवळाकडंच.” म्हणत आबा उठला, तर शारदानं चहा आणला. म्हणाली,

 “दाजी, च्या तर पिऊन जावा गरिबाचा.”

 “आसं का वैनी? द्या पेतो की!” म्हणत आबानं हात पुढे केला. 

“च्याला म्या कदी नगं म्हनतनी.” म्हणत फुरका मारला. आबाचा ल्योक मिलिट्रीत आहे. त्याच्या आधारानं आबानं मळा फुलवला. बोरला पाणी भरपूर लागलं. आबाची कोरडवाहू शेती पाण्याची झाली. शारदानं आबाच्या ल्योका-सुना-नातवाची विचारपूस केली. आबानंही माऊलीच्या बायकोला दिवस गेलेत की नाही ते खूबीनं काढून घेतलं. ऐसपैस गप्पा मारून आबा गेला. दिवसभर फवारून अंग पिळवटून गेलतं. माऊली सुपारी खायला चौकात आला. तिथं दुष्काळाची चर्चा सुरू होती. माऊली पिचकार्‍या मारत बसला. जाधवाच्या रामनं सांगितलं की, उद्या आपल्या शिवारात केंद्रीय पथकाचा दुष्काळ पाहणी दौरा आहे. माऊलीनं विचारलं,

 “कोन-कोन हाय गा पथकात?”

 “अधिकारी आस्तेत मोठे.” -गणेश.

 “मग तेन्ला काय झाट्टा कळतंय?” माऊलीनं असं म्हटल्यावर सगळे हसायला लागले. सकाळी माऊली ग्रामपंचायतीपुढं आला. तिथं त्याला माहिती मिळाली की, पथक तळ्याकडच्या इनामाच्या शिवारात आलंय. माऊली सरसर इनामाकडं निघाला. या शिवारात बागायत जास्त आहे. विहिरींना, बोअरना पाणी आहे. त्यामुळं इनाम शिवार हिरवागार दिसतो. माऊली घामाघूम झाला होता. बघतो तर रोडला गाड्यांची भली मोठी रांग. लाल दिव्याच्या गाड्या, कारा, पोलीसगाडी. गर्दीतून माऊली पुढे आला. पथकासोबत तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी, आमदारही होते. सगळे शिवाप्पा सावकाराच्या ऊसाकडं गेले. त्यातल्या पंजाबी घातलेल्या एका बाईनं विचारलं, 

 “ये क्या है?” 

 “ये ऊस है. कारखाने में इसकी शक्कर बनती है.” आमदारांनी माहिती पुरवली. 

 “इसे कैसे खाते है?" म्हटल्यावर सावकारानं दोन-तीन चांगले ऊस काढून आणले. त्यातला एक मोडून आमदाराला, एक तुकडा त्या गोऱ्यापान बाईला दिला. आमदारांनी ऊस सोलून खाऊन दाखवला. सावकारानं सगळ्या साहेबांना एक-एक कांडकं दिलं. हास्यविनोदात ऊसपान कार्यक्रम रंगला होता. माऊलीचं डोकं सटकलं. तो पुढं होऊन आमदारांना म्हणाला,

 “सायेब, हेन्ला तिकडं खाल्लाकडल्या शिवारात घिऊन चला. हितं इनामाच्या मळ्यावात कशाला आनलाव?” 

आमदार तुच्छतेनं म्हणाले, 

 “तिकडं पक्का रोड नाही. गाड्या कशा जाणार? व्हय रं?” 

 “मग हे लोक ऊस बघून काय शेट्टाची भरपाई देणार?” माऊली तापला. त्याला उत्तर न देता आमदार अधिकाऱ्यांना घेऊन पुढं पाटलाच्या शेताकडं निघाले. दोन्ही बाजूंना मशीनगन घेतलेले सिक्युरिटी गार्ड. मागे पोलीस. एकाएकी माऊली गर्दीतून पुढे घुसला. अधिकाऱ्याजवळ जाणार तोच गार्डनं अडवलं. तरी माऊलीनं मुसंडी मारून एका अधिकाऱ्याचा हात धरलाच. अधिकारी घाबरला. माऊली त्याला ओढत ओरडू लागला,

 “हितं कशाला टायमपास करलालाव, मायघाल्यांनोऽऽ तिकडं हामच्या शिवारात चलाऽऽ करपल्याली पिकं बघा.” पोलिसांनी माऊलीला गच्च पकडलं. ते माऊलीला बाजूला ओढू लागले. त्या अधिकाऱ्याचा हात माऊलीच्या हातातून निसटला, तरी पथकातले सगळे सदस्य घाबरून माऊलीकडेच बघत स्तब्ध उभे राहिले. 

 “चला, माजं शेत बगाऽ चला सायेब! चलो, देखो मेरा खेत. पूरा जल गया. काटा निकल्या ओऽऽ” पथकाकडं बघत माऊली ओरडत होता. रडत होता. पोलीस त्याला धरून गाडीकडे नेत होते. माऊलीला पोलीसगाडीत घातलं. गाडी निघून गेली. आमदार भेदरलेल्या अधिकाऱ्यांना घेऊन धीर देत पुढे निघाले. गर्दीला चेव आला. रामनं घोषणा दिली,

 “केंद्रीय पथकऽऽ” 

लोक ओरडले, “मुर्दाबादऽऽ” लोक खवळले. ‘आमचा सर्वे - नीट करा’, ‘केंद्रीय पथक -मुर्दाबाद’ अशा घोषणा सुरू झाल्या. केंद्रीय पथकाने पाहणी आवरती घेतली. पोलीस बंदोबस्तात गाड्यांमध्ये बसून पथक पसार झालं.

          - प्रमोद कमलाकर माने

          •••

(पूर्वप्रकाशित: अक्षरलिपी दिवाळी विशेषांक २०२१)

रेखाटने साभार: जितेंद्र साळुंके 


बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

गझल


  


ये शहर मुझे रास न आया

यूँ जिने का अहसास न आया


क्या पाया क्या खोया मैने

कोई भी तो पास न आया


सबकुछ था फिर भी मुझ को 

रहनसहन का मिजास न आया


बुत बनकर यूँ बैठे हैं कि

दिल में उम्मीद-ओ-यास न आया


हाल बयाँ करने का जुनूँ था

लफ्जों में कुछ खास न आया


     - प्रमोद माने 

        १४|०२|२०२४


 बुत= पुतळा

उम्मीद-ओ-यास = आशा आणि निराशा

शुक्रवार, ७ मे, २०२१

शेतकऱ्यांच्या होरपळीची गाथा: ‘वीजेने चोरलेले दिवस’


       'वीजेने चोरलेले दिवस' ही संतोष जगताप यांची एका ज्वलंत आणि वेगळ्या विषयावरची कादंबरी नुकतीच दर्या प्रकाशन, पुणे यांच्याकडून आलेली आहे. ही कादंबरी आशय, विषय, भाषा, निवेदन अशा अनेक अंगांनी महत्त्वाची आहे. शेतीसाठी भारनियमन हा अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना छळणारा विषय झाला आहे. रात्री उशिराची वीज सोडणे, डीपीवर जास्त लोड असल्याने ट्रान्सफॉर्मर जळणे, तो दुरुस्त होऊन न मिळणे, त्यासाठी शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करावी लागणे अशा अनेक समस्यांना शेतकरी तोंड देत आहेत. मराठी साहित्यात प्रथमच हे सर्व बारकाव्यांनिशी आलेले आहे. लाईनमन, वायरमन, झिरो वायरमन, डीपीची दररोज देखभाल करणारा लोम्या म्हणजेच लोकल म्यानेजर, साहेब, सरकारी धोरणे या सिस्टीममध्ये शेतकरी कसा हतबल होऊन अडकलेला असतो ते खूप छान मांडलेले आहे. लेखकाने हे सगळं जीवन स्वतः जगल्यामुळेच प्रत्ययकारीपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे. जगू हा या कादंबरीचा नायक असून तो ग्रॅज्युएट आहे. तरी मायबापासोबत रानात दिवस-रात्र खपतो आहे. मध्यरात्री उठून बापासोबत शेतात पाणी द्यायला जायचं. बंद पडणाऱ्या स्टार्टरचं बटण दाबायला विहिरीजवळ बापानं थांबायचं आणि स्वतः दारं धरायचं. ह्या जागरणानं बिघडणाऱ्या तब्येतीचा विचार न करता पीक जगवण्यासाठी दररोज तुकोबाकथित ‘युद्धाच्या प्रसंगाला’ तोंड द्यायचं. ह्या जगण्यासोबतच रानातली त्यांची वस्ती, ते शिवार, तो परिसर लेखकाने  सेंद्रियतेने आपल्यापुढे उभा केला आहे.

    या कादंबरीत प्रथमपुरुषी निवेदन असून ते अतिशय रोखठोक अशा लोकभाषेत आलेले आहे. सांगोला परिसरातील लोकभाषेची सगळी वैशिष्ट्ये, लोकम्हणी, वाक्प्रचार, शब्द यांचा वापर लेखकाने खुबीने केलेला आहे. या निवेदनात कुठेही एकसुरीपणा आलेला नाही. पट्टीच्या गोष्ट सांगणाऱ्याकडे ज्या-ज्या क्लृप्त्या  असतात त्या सर्व लेखकाच्या निवेदनात येतात. अर्थातच हे ओढून ताणून आणलेले नाही; तर नैसर्गीकपणे  आलेले आहे. हे निवेदन शेवटपर्यंत वाचकाला पकडून ठेवते. निवेदनामध्ये लोककथांचा वापर दृष्टांतासारखा केलेला आहे. नायक कधी तिरकसपणे, कधी विनोदी पद्धतीने, कधी उपरोधाने गोष्ट सांगत राहतो. 

      कादंबरीची भाषा खूपच समृद्ध आहे. या भाषेमुळेच कादंबरीला एक जिवंतपणा आला आहे. या दृष्टीने कादंबरीची सुरुवात पाहण्यासारखी आहे-

 ‘होल कंट्रीत आपणच भारी. आपल्या लेकराबाळांसकट, म्हाताऱ्याकोताऱ्या  समद्यांला  दर एक-दोन तासांनी व-वरडून आनंद साजरा करता येतो. लाइट आली... लाइट आली... आली... आली... लाइट आली... असं मुसळानं टिऱ्या बडवत. गुड नाईट!’

   ‘आमची माणसं आमच्याच मातीत घालत अर्थातच रेडिओचा आवाज कमी केला तरी कडू ना हालिंग ना डुलिंग ओन्ली गपगार पडिंग.’ असं उपरोधिक, विनोदी अंगानं येणारं निवेदन अस्सल आहे.

  एखाद्या  विषयावर ठरवून कादंबरी लिहिताना ती एकांगी होण्याची शक्यता अधिक असते; पण लेखकाने या कादंबरीत तोही तोल छान सांभाळला आहे. जगण्याचाच एक भाग बनून हा विषय समोर येतो व त्याच सोबत इतर पातळ्यांवरचे जगणेही सोबतीने येते.  या कादंबरीतील भाषा ही जिवंत व रसरशीत आहे. ही त्या परिसराची लोकभाषा आहे. लेखकाने ती पुरेपूर सामर्थ्यानिशी वापरली आहे. आजवर्दी, कडू, घांगऱ्याघोळ, रातचंइंदारचं, नादीखुट, येरवाळी, बुरंगाट, डोक्यालिटी असे परिसरातील बोलीतील अस्सल शब्द या कादंबरीत सहजतेने येतात. 

    टाळक्यात वाळकं, बाळंतपण निस्तारणं, आभाळ हेपलणं, व्हरा हाणणं, कासुट्यात जाळ होणं, भेडं होणं, मधल्यामधे गाळा हाणणं, बेंबटाला वढ बसणं, खिरीत सराटा निघणं,  गांडीवर काटं उभा राहणं, अशा अस्सल वाक्प्रचारांमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त झाले आहे. 

   आपण धड तर जग ग्वाड, फुकटचं खाणं न् हागवणीला कार, म्हातारीनं पंजाण घातलं म्हणून ती पोरगी होईल का, लाडका किडा न गावाला पिडा, भिणाऱ्याच्या मागं म्हसोबा, घराचा उंबरा दारालाच म्हायती, दिवा जळं, पिडा टळं अशा म्हणींच्या उचित वापरामुळे कादंबरीतील भाषा संपृक्त झाली आहे.

      शेतकऱ्यांचे वीजेने चोरलेले दिवस ह्या कादंबरीत धरून ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे. ह्या कादंबरीत आलेले भीषण वास्तव हे अपवादात्मक नसून सार्वत्रिक व सर्वकालिक असल्याने ही कादंबरी महत्त्वाची ठरते. आधीच अस्मानी, सुलतानी समस्यांनी मेटाकुटीला आलेला शेतकरी वीजेच्या भारनियमनामुळे आणि भ्रष्ट व्यवस्थेतील ढिसाळपणामुळे कसा कोलमडून पडतो; याचे प्रत्ययकारी चित्रण या कादंबरीत आलेले आहे. 

       लेखकाची ही पहिलीच कादंबरी असूनही लेखकाने ताकदीने हा वाङमयप्रकार हाताळला आहे. त्यांच्या पुढील लेखकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

पुस्तकाचे नाव- वीजेने चोरलेले दिवस (कादंबरी)

लेखक- संतोष जगताप

प्रकाशक- दर्या प्रकाशन, पुणे 

पृष्ठे-  १५६

मूल्य- ₹ २२०

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

मराठी भाषेला समृद्ध करणारा कवितासंग्रह: पुन्हा फुटतो भादवा




  कवी अमृत तेलंग यांचा ‘पुन्हा फुटतो भादवा’ हा कवितासंग्रह पुण्याच्या ‘दर्या’ प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. समग्र ग्रामजीवन कवेत घेणाऱ्या या संग्रहास महाराष्ट्र शासनाच्या 'बहिणाबाई चौधरी' पुरस्कारासह लोककवी विठ्ठल वाघ पुरस्कार, पद्मश्री नामदेव ढसाळ पुरस्कार असे मानाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

   मराठवाड्याच्या मातीतली ही कविता आपले सत्त्व आणि स्वत्व जपणारी आहे. ही कविता कुणब्याच्या ‘ढोरकष्टाचा अभ्यासक्रम’ आपल्यापुढे ठेवते आणि कुणब्याच्या पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याची क्षमताही बाळगते.

    ग्रामीण कवितेवर असा आरोप होतो की, ही कविता माती, बाप, ढेकूळ, बुक्का,  काळी माय, हिरवा शालू अशा टिपिकल साच्यातून बाहेर पडायला तयार नाही. ग्रामीण कवी भाबडेपणानेच व्यक्त होतो. त्याचा कृषीसंबंधित राजकीय-अर्थशास्त्रीय धोरणे, जागतिकीकरणाचे परिणाम इत्यादी बाबींचा अभ्यास नाही. आवाका नाही. वगैरे.  अमृत तेलंग यांची कविता शेती आणि खेड्याच्या अवनतीचा चौकसपणे वेध घेते.

     ही कविता व्यापक आशय कवेत घेणारी आणि नैसर्गिक प्रसरणशील आहे. या कविता वाचताना तिच्यातल्या काव्यतत्त्वाचे वारंवार दर्शन होते. ह्या काव्यदर्शनामुळे  रसिकाला होणारा आनंद शब्दातीत असतो. हल्ली मराठी कवितेतून हे काव्यतत्त्वच लुप्त झाले आहे. अलिकडची कविता वाचताना, कविता वाचतोय की वैचारिक ललितगद्य वाचतोय अशी शंका वारंवार येते. पण ही कविता वाचताना निखळ कविताच भेटते.

    शेतकरी सोडून गावगाड्यातील इतर उपेक्षित, वंचित घटकांविषयी ही कविता बोलत नाही; असाही आरोप मराठी ग्रामीण कवितेवर होतो. अमृत तेलंग यांची कविता  कुणबी, मजूर, बलुतेदार, गावकुसाबाहेरील कष्टकरी ह्या साऱ्यांविषयी आस्थेने बोलत राहते. ‘महादू कुंभार’,  ‘किसन लोहार,’  ‘सटवा सुतार’ इत्यादी कवितांमधून मोडलेल्या गावगाड्याविषयीचे मूलभूत चिंतन प्रकट होते.

    मराठवाड्याच्या अस्सल बोलीभाषेचं लेणंच या कवितेत गवसतं. कोरड्यास, जागल, बिदीशी, खवंद, चेलमा, आऊत, परतपाळ, वाकाण, चलिंत्र, येसन, व्हाटोळ, रवंदळ, कुंधा, आरकट, जळतन, उकंडा.... इत्यादी अनेक अस्सल मराठवाडी शब्द या कवितेत सहजपणे आले आहेत. या शब्दांचा सुगंध या कवितेला आहे.
 ‘पोटाला पाय लावून निजलेली रात’ कुणब्याच्या वाट्याला नेहमीच येते; हे कवी ताकदीने मांडतो. मायबापावरील त्यांच्या कविता तर हलवून टाकणाऱ्याच आहेत.

‘तापलेल्या वाळूत ज्वारीच्या लाह्या
 फुटाव्यात
 तसे फटफट फुटत जातात तुझे दुखरे शब्द’ (माय तू घोकत आलीस) किंवा
‘भाकरीचा पापोडा करपत जावा
तशी करपत गेलीस माळरानात’ अशा ओळींमधून आलेल्या अस्सल प्रतिमा कवितेला उंची प्राप्त करून देतात.

   ‘इपरीत’, ‘खंगत गेला गाव’ अशा कवितांमधून बदलत चाललेले ग्रामवास्तव अचूकपणे मांडण्यात कवी यशस्वी झाला आहे. उद्ध्वस्त होत चाललेल्या गावाचे अवशेष कवीने आपल्यासमोर आणून ठेवले आहेत. केवळ स्मरणरंजनातच न रमता कवी कृषीव्यवस्थेच्या दुखण्यापाशी पोहोचतो आणि आजच्या अस्वस्थ करणाऱ्या वर्तमानाची नोंदही घेतो.

     ग्रामीण स्त्रीजीवन हे कष्टांनी, दुःखांनी किती व्यापलेलं आहे; हे कवी प्रभावीपणे आपल्या कवितांमधून मांडतो.

‘तुझा जलम गं बाई
जशी धुपती गवरी
ऊन पाऊस झेलून
चाले डोंगराची वारी’ (कृष्णाई)

 अशा ओळींमधून या उपेक्षित जगाकडे कवीने लक्ष वेधले आहे. ‘चिमा’ ही कविता आख्यानकाव्याचा एक उत्तम नमुना आहे. ‘कृष्णाई’ ही कविता गावकुसाबाहेरील तांड्यावरच्या एका बंजारा स्त्रीच्या कष्टप्रद जीवनाचे कारूण्यगीतच आहे.

    कवीने मुक्तछंदाबरोबरच मराठीतले अभंग, ओवी, अष्टाक्षरी हे छंदही ताकदीने वापरले आहेत. ‘रानाचा वाली गेला’, ‘धीट आंधळा जलम’, ‘पोरा’, ‘त्याला भेटायचा सूर्य’, ‘खंदारवाट’, ‘इपरीत’, ‘खंगत गेला गाव ‘, ‘माय तू घोकत आलीस’, इत्यादी अनेक उत्कृष्ट कविता या संग्रहात आहेत. ‘गावरान ‘सारख्या कवितांमधून कवीचा उपरोध तीव्रपणे प्रकट झाला आहे.

      पहिल्याच संग्रहात पूर्वसुरींचे कुठेही अनुकरण न करता कवीने स्वतःची पायवाट शोधली आहे. ही कविता आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे केवळ दुःखच न मांडता ‘पुन्हा फुटतो भादवा’ असा आशावादही पेरते.

‘कुणबी पेरावा
कुणबी उगावा
कुणबी विकावा । बाजारात

कुणं बी चोळावा
कुणं बी पिळावा
कुणं बी दळावा । पाळूखाली’  ( कुणबी )

 अशी स्तिमित करणारी दमदार कविता लिहिणाऱ्या या तरूण कवीची कविता अशीच फुलत राहो. तिने नवनव्या शक्यतांचा मागोवा घेत राहून अधिकाधिक विकसित होवो; यासाठी सदिच्छा!

     कवी आणि चित्रकार विष्णू थोरे यांचे अर्थवाही मुखपृष्ठ व आशयाला गडद करणारी सुंदर रेखाटने, कलात्मक मांडणी, सुबक आकार यामुळे हा संग्रह देखणा झाला आहे. मलपृष्ठावरील कवी अजय कांडर यांचे ब्लर्ब कवितेचा आशय आणि बलस्थाने यांना अधोरेखित करणारे आहे.
       


बुधवार, ६ मे, २०२०

लाॅकडाउन स्टोरीज

                  

 


                        ॥१॥

आमच्या ह्यांनी आज दुपारी स्वतः किचनचा ताबा घेतला. स्वतःच्या हातांनी मस्त कांदाभजे बनवले. मला तर बाई खूप कौतुक वाटलं. ह्यांनी भजे बनवताना मोबाईलवर मला फोटोही घ्यायला लावले..
सगळ्यांना स्वतः प्लेटी लावल्या. माझ्यासाठी थोडे भजे आठवणीनं बाजूला काढून ठेवले बरं का! मग काय घरभर कौतुक. मला सासूचे टोमणे. 

    मग हे मोबाईल घेऊन बसले. फेसबुक, इन्स्टा, व्हाटसपवर भजे बनवतानाचे फोटो शेअर करत. मोठमोठ्याने काॅमेंटस् वाचून दाखवत. "अगं माहितंय का? कोण लाईक केलंय?"  मी किचनमधूनच विचारलं, "कोण?" 
"सचिन सुरवडकर! खूप मोठे फेसबुक सेलिब्रिटी आहेत!"
"होऽ क्का?"  मी पहिल्यांदाच नाव ऐकलं होतं; पण ह्यांच्या उत्साहावर विरजण पडू द्यायचं नव्हतं. आता मला किचन आवरायचं होतं. बाहेर येऊन ऐकू वाटत होतं. कोणकोण कायकाय म्हणतंय. पण... खूप पसारा... सांडासांड, तेलाचे डाग, दुप्पट भांडी... किचनकडे पहावंस वाटत नव्हतं. एवढं घाणेरडं किचन पहिल्यांदाच बघतेय.

   हुश्श! झालं एकदाचं. दोनतीन तास गेले आवरायला. पण हे आज खूपच खूष आहेत. एवढे दिवस सलग घरी बसायची सवय नाही ना! आम्ही बायका काय, नेहमीच घरी असतो. मोबाईलचा प्रकाश ह्यांच्या चेहऱ्यावर पडलाय.  ह्यांचा चेहरा कसा प्रसन्न दिसतोय. वाढलेल्या केसादाढीमिश्यातही. 

__________________________________________________

             ॥२॥

किश्याचा काॅल आला. चार्जिंगचा मोबाईल काढून काॅल घेतला.

"अबे! कुठं गडप झालास?"

"घरीच हाय बोल.."

"माझ्या पोस्ट बघत नाहीस. स्टेटस बघत नाहीस. लाईक नाही. काही शेअर नाही. हैस का गचकलास वाटलं. कधी फेसबुक,
वाटसपकड ढुंकूनबी न बघणारे टिकटाॅकवर स्वतःचे व्हिडिओ बनवून टाकायलेत. फेसबुक लाईव्हवर यायची तर चढावढ लागल्याय. रिकाम्यारानी वेळ हाय म्हनून.  तू तर नेमानं हाजेरी लावनारा. कुठंच कसं दिसंनास म्हनून काळजी वाटली. म्हनून म्हंटलं बघावं. ह्ये बेणं करतंय तर काय? का दोन्ही टायमाचा सैपाक तूच करायलास. वैनींना आराम म्हनून?"

   आता काय बोलावं ह्याला?

"आबे, टिव्ही बिघडलाय. अन् गाबडे मोबाईल सोडतच नाहीत. एक हिचा घेऊन बसतंय अन् एक माझा... आता का बोंबलावं?"

"आवघडाय मग टाएम कसा जातो बे?..." किश्या बोलतंच होता लांबणीखाली तर धाकलं मागून शर्टला ओढत होतं
'पप्पा झालं का? द्या की..' म्हणत.

________________________________________
           
                ॥३॥

आमचं चौकोनी कुटूंब. मस्त चाललं होतं. आईवडील गावाकडे आहेत. आम्ही नोकरीच्या गावात अडकलोय. घरात बसून- बसून कंटाळलो होतो. काहीतरी करायला पाहिजे.. मग.. मी आज स्वतःहून अंगण झाडलं. भांडी घासली. धुणं धुतलं. मुलांना आंघोळी घातल्या. हिचं "अहो राहू द्या..राहू द्या." सुरू होतं. मी ठाम होतो. पुरूष असल्यामुळे जरा जडच गेलं. दररोज असली कामं या बायका न कंटाळता कसं करतात कोण जाणे? थोडी चिडचिडही झाली. पण तोंड आवरतं घेतलं.

       सगळं काम झाल्यावर हिचं बँडेज बदललं. काल भांडणात माझा तोल गेला. हिच्या हाताला चांगलीच जखम झाली. खूप रक्त गेलं. हिने सगळ्यांना 'चुकून विळी लागली' म्हणून मला तारलं. असो! आता दोनतीन आठवडे तर मलाच धुणीभांडी करावी लागणार! सुटका नाही.

____________________________________________
         
                ॥४॥

मयतीला किती माणसं होते? यावरून त्या मेलेल्या माणसाला समाजात काय मान होता? त्याने किती माणूसकी कमावली होती? हे ठरवलं जातं. त्याची खरी प्रतिष्ठा मेल्यावरच कळते. मयतीला आलेल्यांची संख्या त्या मेलेल्या माणसाच्या आणि कुटूंबाच्या प्रतिष्ठेची बाब असते. विशेषतः ग्रामीण भागात या संख्येला फार महत्त्व आहे.

      या लॉकडाऊनच्या काळात आमच्या गावातले, गल्लीतले एक वयस्कर बाबा मरण पावले. खूप दिवसांपासून आजारी होते. त्यांची वयस्कर पत्नीच त्यांचं सगळं करायची. घरात ते दोघंच राहत होते. त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त परराज्यात राहतो. तिकडंच अडकून पडलाय. मुलगी पुण्यात राहते. शेजारी भावकीतली एकदोन घरं आहेत. भावकीतल्यांनी मुलाला व मुलीला फोनवरून कळवले. ग्रामपंचायतीसही कळवले. मुलगा येऊ शकत नव्हता. मुलीला परवानगी मिळाली तरी आजच्या आज येणं शक्य नव्हतं. रात्रीच अंत्यविधी उरकण्याचं ठरलं. प्रेताला अंघोळ नाही. काही नाही. शेजारच्या तालुक्यातल्या एका गावात राहणारी बहीणही पोहचू शकली नाही. एक पॅजो (टमटम) आला. दोघांनी अंथरूणासह उचलून मागे मृतदेह टाकला. भावकीचे दोनतीन माणसं मोटारसायकलवरून निघाले. पॅजोत फक्त म्हातारी आणि एक भावकीतली बाई. पॅजो हलला. अंत्यविधी उरकला गेला. व्हिडिओ काॅलवर चुलत भावानं त्या अभागी बहीणभावाला अंत्यविधी दाखवला. इच्छा असूनही नियमांमुळे गावातल्या, गल्लीतल्या कुणालाच मातीला जाता आलं नाही.

          दुसऱ्या दिवशी राख सावडायला तर पोहचू या आशेनं मुलीनं परवानगी मिळवली. गाडी करून निघाली. पुणे जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांनी अडवलं. 'अंत्यविधी तर कालच झाला ना? आता जाऊन तरी काय उपयोग? मी माझ्या आईच्या मातीला जाऊ शकलो नाही. सीमाबंदी आहे.' असं म्हणून वाहन परत पाठवले.

           मेलेल्या बाबांची सख्खी बहीण कशीबशी राखंला पोहचली. तिचा आक्रोश ऐकून वाईट वाटलं.
   
         मेलेल्या मायबापाचं शेवटी तोंडही पहायला मिळू नये अशा या वाईट काळात मृत्यू येऊच नये.

___________________________________

               ॥५॥

             
दररोज कामावर जाताना आजुबाजूच्या शेतात कामं चाललेली असत. जमिनीची मशागत ते पीक काढणीला येईपर्यंत काय उस्तवारी करावी लागते, ते शेतकऱ्याचा मुलगा असल्याने माहीत आहे. दररोजची झटाझोंबी रोडच्या आजुबाजूच्या शेतातून चाललेली दिसे. कधी सरी सोडायचं काम. कधी लावण. कधी खुरपणी. कधी आधारासाठी रोपांना काठ्या रोवणं, तारेचा मांडव करणं. कधी फवारणी. तर कधी पाणी सोडणं. शेतातली कामं हनुमानाच्या शेपटीसारखी संपतच नाहीत. कुणाची केळी लावण तर कुणाची भाजीपाला लागवड. कुणाची धानपेर तर कुणाची ऊसलावण. एकतर पाण्याची बोंबाबोंब. शेतात शाश्वत पाणी व्हावं म्हणून शेतकरी अनेक दिव्यातून जात असतो. ब्लास्टिंग करून विहिर खोल घाल. क्रेन आणून गाळ काढ. ऐन मोसमात पाण्यानं चट्टा दिला तर काढाकाढी करून बोअर घे. असे नाना उद्योग सोबतीनं करावे लागतात.
     आलेल्या मालाच्या पट्टीतून खर्च वजा जाता काहीच उरत नाही. उरलंच तर शेतातच गुंतवणूक करावी लागते. स्प्रिंकलर सेट घ्या. नाहीत पाईपलाईन करा. लेकरं हिंडेनात का लक्तरं घालून. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोडून आधुनिक शेती केली तर चांगलं ऊत्पन्न मिळू शकतं. मग त्यासाठी लागणारं भांडवल काय चोरी करून आणायचं का? शेतकऱ्याला सल्ले देणं खूप सोपं आहे. पण शेतीच्या चरकातून पिळून निघणं वेगळं. ते शेतकरीच सोसू जाणो!
        तर असे हे आजुबाजूचे शेतातले कामं बघत ये-जा सुरू असायची. लॉकडाउनमुळे काही दिवस घरीच होतो. खूप दिवसांनी कामानिमित्त त्या रोडने निघालो. बघतोय तर काय? काम करणाऱ्या माणसांनी गजबजलेल्या शेतात टोमॅटो झाडालाच पिकून सुकून गेलेत. खाली टोमॅटोचा सडा पडलाय. शेतात माणूसच नव्हतं. कसं असेल? समोरचं चित्र पाहून वेड लागेल. बाजूच्या एका शेतात केळीची बाग मोडायचं काम सुरूय. ऐन काढणीला हे विषाणूचं इघीन आलं. मग गारपीट झाली. कसंबसं उरलंसुरलं झोडपून गेलेलं कुणी काढून घरी आणलं. कुणाचं रानावरच सडतंय. कोण घेणार माल? आणि किती घेणार लहान खेड्यात? कुणी सडकेलगत माल घेऊन बसलंय. कुणी द्राक्षं, कुणी कलिंगडं. अशी कितीशी वाहनं जाणारायत त्या आडमार्गाच्या सडकेनं या लॉकडाउनच्या काळात? पण माल फेकून द्यायची हिंमत सगळ्यांकडे नसते. कुणी माल गावात फुकट वाटून टाकतंय. कुणी पिकात जनावरं सोडतंय. काही शेतकरी व्हाटस्अपवर ऑर्डर घेतायत. अशी किती ऑर्डर मिळेल? किती माल कटेल? बाकीच्या मालाचं काय?
     रबीचा हरभरा घरात पडून आहे. कधी आडतबाजार सुरू होईल? कधी वाहन मिळेल? कधी नंबर लागेल? याची काही शाश्वती नाही.
    किती शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरलं? किती स्वप्नांची धूळधाण झाली? किती कंबरडे कायमचे मोडले? गणती नाही.

_______________________________________________
(Image created with metaAI) 


बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

आटलेल्या पावसाची फाटलेल्या शेताची कविता




-केशव सखाराम देशमुख

   शेतकऱ्यांच्या लेकरांना कविता लिहायचा ‘सराव’ करावा लागत नाही. शब्दांच्या बुडबुड्याशी खेळून कवितांचे छूमंतर करण्याचा नाद मग जडत नाही. खरे म्हणजे, कविता उदंड झाली. ऊठसूट, जो तो उठतो तो कविताच लिहितो.

     शेती म्हणजे आतबट्ट्यांचा धंदा! व्यथा पुष्कळ. कथाही पुष्कळ. पावलोपावली होरपळ. शेतीच्या धंद्यात पडणं म्हणजे होरपळीची हमी. होलपटीचे वाटेकरी. दुष्काळाशी सामना आणि शोषणाचे कायम मानकरी! अशा दुष्कृत्याची कारूणिक व्यथा शेतकऱ्यांची ‘कवी’ झालेली लेकरं मांडत आहेत. प्रमोद कमलाकर माने हे असंच कवितेमधलं गुणी लेकरू आहे!!

   ‘कोरडवाहू’ शीर्षकाचा प्रमोदचा ६४ पानांचा प्रामाणिक अनुभवांनी व्यापलेला आणि शेतकऱ्यांची पावसाबिगर सुरू असणारी कुत्तरओढ मांडणारा हा कवितासंग्रह आहे.

     प्रमोदची आरंभीची पावलं या त्याच्या कवितेत उमटतात. रचनेचा त्याला फारसा सराव नाही. साधेपणाचे लावण्य लेवूनच तो कविता लिहितो. त्याच्या कवितेच्या जन्मकळा पुष्कळ इमानी आहेत. अनुभव घट्ट मांडण्यात तो कमी पडतो. तरीही; कविता लिहिताना विषयांची उसनेगिरी वा उचलेगिरी करायचे त्याला काम पडत नाही. जगणे व भोगणे हे प्रमोदच्या कवितेचे प्रमुख मैदान आहे! भुकेच्या अवकळा हा त्याच्या कवितेचा प्रांत ठरतो. जमिनीच्या भेगा व न बरसणारे ढग: हे प्रमोदच्या कवितेची निर्मितीप्रक्रिया होय. प्रमोदला दुःखातून फुटून व्यक्त झाल्याशिवाय आनंद मिळत नाही.

     ‘रवंथ’ या कवितेत दुष्काळ आणि ढोरवासरांच्या दैना प्रमोदने नेमक्या शब्दांतून मांडल्यात. कुणब्याच्या घरातली गरीबी ‘बळीराजा’ कवितेतून मुखरीत होते. उपासमारी व अवहेलनेचे करूण चित्र ‘दुस्काळ’ कवितेतून उमटते. ‘रंगारी’ या कवितेतून अवर्षण आणि शेतीपाणीवर गुदरलेले संकट फार प्रभावीपणे येते. ‘जुवाखाली’ कवितेत शिवाराची सावली, लक्ष्मी असलेल्या बैलांचे शब्दचित्र आले आहे. ‘कुठवर’ या कवितेत गरीबीचे दाह सोसून आकार पावणारे बंड येते!! थोडक्यात काय तर, ‘कोरडवाहू’ कविता ही करपलेल्या शिवारांची आणि होरपळलेल्या कष्टकऱ्यांची कविता आहे. या अवघ्या होरपळीचा प्रमोद हा कवी साक्षीदार आहे.  ही अवघी कविता लिहिताना प्रमोदला कुणाची नक्कल करावी लागत नाही. त्याला कवितांचे क्षेत्र शोधावे लागत नाही. जगणे, भोगणे,  आठवणे आणि  लिहिणे ही क्रियापदं प्रमोदच्या कवितेची उगमांची स्थळे आहेत.

कथा

सुक ना दुक

गनामामाला सगळं गाव नेता म्हनायचं. गावात कुठला पुढारी आला, परचारसबा आसली की, गनामामा हार घालायला सगळ्यात पुडं. इस्टेजवर खुडचीत गनामामा ...

उपशीर्षक